जेव्हा रंगमंच एक ‘जिवंत’ वर्ग बनतो…

created on Feb 28, 2026 by Sajitha S.K

नुकतेच 'सजग'च्या सहकार्याने मुलांनी एका नाटकाचे सादरीकरण केले. हा लेख म्हणजे  नाटकाचा  मंचापर्यंतच्या प्रवासाचा थोडक्यात घेतलेला आढावा आहे. नाटक बसवण्याची ही प्रक्रिया कशी होती आणि यातून मुलांनी पुस्तकाबाहेरचे कोणते धडे गिरवले, याची ही एक छोटीशी झलक!

सजगच्या ‘विद्यासदन’ मधील वर्गात पाऊल ठेवताना वाटलं होतं की, शिक्षणाचे सगळे सिद्धांत आपल्याला ठाऊक आहेत आणि याआधी आदिवासी मुलांसोबत काम केल्याचा अनुभव इथे नक्कीच उपयोगी पडेल. पण तो अनुभव या शहरी वस्तीतल्या मुलांसोबत काम करताना अपुरा पडेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. या मुलांमधली हुशारी आणि त्याच वेळी दिसणारी हतबलता इतकी टोकाची होती की, नक्की आपण कोणाशी संवाद साधतोय, हेच अनेकदा समजायचे नाही. वयाच्या अवघ्या १०-१५ वर्षांत त्यांनी जेवढं जग पाहिलं होतं, तेवढं कदाचित आपणही पाहिलं नव्हतं. त्यामुळे मुळाक्षरे किंवा बेरजा-वजाबाक्या शिकवण्याचे ठरलेले फॉर्म्युले इथे फार यशस्वी ठरत नव्हते.

वर्गाची सुरुवात छान व्हायची, पण कोणीतरी मागून चिडवलं की लगेच गोंधळ उडायचा. शिक्षणाचे सगळे सिद्धांत पणाला लागत होते. अनेकदा संयम सुटायचा, चिडचिड व्हायची आणि रडूही कोसळायचं. पण राग शांत झाल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागायची. यातून मुलांचा विश्वास नक्कीच जिंकता आला, पण घरचे प्रश्न आणि नात्यांमधली गुंतागुंत बाजूला ठेवून त्यांनी एका मोठ्या ध्येयासाठी एकत्र कसं यावं? शाळेसारख्या 'बोरिंग' वाटणाऱ्या जागेचं महत्त्व या हुशार मुलांना कसं पटवून द्यावं? हे मोठे प्रश्न होते.

नाटक, चित्रपट आणि पुस्तकांच्या आवडीतूनच एक दिवस मुलांना सहज विचारलं, "आपण या एका पुस्तकावर नाटक करायचं का?" आणि तोच या वर्गाचा खरा 'टर्निंग पॉईंट' ठरला! मुले एका उद्देशासाठी एकत्र आली, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ‘जादुई पोतडी’ या नाटकाचा जन्म झाला.

हे नाटक निकोला डेव्हिस यांच्या ‘द प्रॉमिस’ (The Promise) या पुस्तकावर आधारित होतं. एका 'कुरूप', 'कठीण' आणि 'निर्दयी' शहरात राहणाऱ्या मुलीची ही कथा. सुरुवातीला मुलांना या शब्दांचे अर्थ विचारले, तेव्हा गप्पांमधून मुलं व्यक्त होऊ लागली. “मित्राला पडताना पाहूनही मदत न करणं हे ‘निर्दयी’ वागणं आहे” किंवा “घरातली भांडणं ‘कुरूप’ वाटतात,” असे त्यांचेच अनुभव या नाटकाची संहिता बनले. हे कुठल्याही काल्पनिक कथेवर बेतलेलं नव्हतं, तर ते मुलांच्या खऱ्या आयुष्याचं प्रतिबिंब होतं. मुले केवळ अभिनय करत नव्हती, तर "हे वाक्य असं नको, तसं घेऊया," असे सांगत संहितेत बदल सुचवत होती, अनेक कामांमध्ये मदत करीत होती.  

या प्रवासात अडचणी भरपूर आल्या. जागेची अडचण आली तेव्हा बागेत जाऊन सराव केला. शिक्षकांसाठीही हा एक वेगळाच अनुभव होता. नेहा ताईंना जेव्हा एका पालकाने विश्वासाने मुलाचे आधारकार्ड दिले, तेव्हा पालकांचा 'सजग'वरचा विश्वास अधोरेखित झाला. तर शैलजा ताईंनी पात्रांचे कपडे ठरवण्यासाठी चक्क लोकल ट्रेनमधल्या प्रवाशांचं निरीक्षण केलं. नियोजनात गोंधळ उडाला, दमछाक झाली, पण मुले मंचावर उभी राहिली तेव्हा सर्व कष्ट सार्थकी लागले.

   

अनुभवातून शिक्षण… 

सुरुवातीला या सरावादरम्यान मुलांमध्ये मतभेद आणि कुरबुरी सुरू झाल्या होत्या. एका मुलीला तिच्या दिसण्यावरून गटातून वगळण्याचा प्रयत्न झाला. तिथेच थांबून एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला "जोपर्यंत कोणाची स्वतःची इच्छा नसेल, तोपर्यंत इथून कोणालाही बाहेर काढलं जाणार नाही". मुलांना सहज विचारलं, "तुमच्यापैकी असा एक जण सांगा ज्याने कधीच काही चूक केली नाही?" तिथे पसरलेली शांतता खूप काही सांगून गेली. या प्रोसेस मध्ये मुले फक्त नाटक करायला शिकली नाहीत, तर स्वतःच्या चुका मान्य करणे आणि ‘क्षमा करणे’ हा मानवी मूल्यांचा धडा देखील गिरवू लागली होती.

हे सगळं घडत असताना जाणवत होतं की, आपण जे शिक्षणाबद्दल तज्ञांचे विचार वाचतो, ते इथे प्रत्यक्ष घडत आहेत. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युई यांच्या मते, शिक्षण हे केवळ शिक्षकाने दिलेल्या माहितीवर नसावे, तर ते प्रत्यक्ष ‘अनुभवातून’ यायला हवे. आपल्या नाटकात हेच घडले. मुलांनी स्वतःचे अनुभव मांडले, त्यावर चर्चा केली. त्याचप्रमाणे, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ पाउलो फ्रेरे यांनी शिक्षणात ‘संवाद’ आणि ‘चिकित्सक विचार’ यांना महत्त्व दिले. जेव्हा मुलांनी स्वतःच्या भांडणांवर तोडगा काढला आणि क्षमा करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते फ्रेरे यांना अपेक्षित असलेले ‘सामाजिक भान’ जपत होते.

सर्वात मजेची गोष्ट म्हणजे, जेव्हा मुले स्वतःच्या गोष्टी सांगू लागली, तेव्हा त्यांना त्या लिहून काढाव्याशा वाटल्या. एकमेकांचे संवाद वाचताना वाचनाची गोडी लागली. साक्षरता हे इथे ध्येय नव्हते, तर नाटकाचा तो एक साहजिक आणि सुंदर परिणाम होता.

पालकांनी देखील मुलांमधील हा बदल अधोरेखित केला. एका विद्यार्थिनीच्या पालक मंगल वाघमारे यांनी सांगितले, “ती रोज घरी येऊन तालमीत काय शिकली हे आनंदात सांगायची. दहावीत असून सुद्धा तिने नाटक आणि अभ्यास दोन्ही छान केले.” तर एका विद्यार्थ्याच्या पालक प्रतिभा शिरसाठ म्हणतात, “नाटकातून माझ्या मुलाला वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याची सवय लागली आहे.”

या नाटकाला खरा कलात्मक आकार दिला तो अत्यंत गुणी नाट्यकलावंत धनश्री खांडकर यांनी. मुलांचे अनुभव आणि त्यांच्या गोष्टी एका धाग्यात गुंफून त्यांनी ‘जादुई पोतडी'चे लेखन आणि दिग्दर्शन केले. आपल्या उत्तम मार्गदर्शनातून त्यांनी मुलांच्या या प्रवासाला एका जिवंत, रंजक आणि सुंदर नाटकाचे रूप दिले.

‘जादुई पोतडी’ हे आता केवळ एक नाटक उरलेलं नाही, तर ती मुलांच्या आत्मविश्वासाची, एकमेकांना समजून घेण्याची आणि बदलाची एक जिवंत गोष्ट बनली आहे.